महाराष्ट्र टुडे न्यूज,,
Maharashtra today news,,
Latur crime news बसस्थानकातील गर्दीचा फायदा; महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारी टोळी उघड
लातूर, प्रतिनिधी :
बसस्थानक परिसरातील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका महिला आरोपीस अटक केली आहे. तिच्याकडून सुमारे ७८ हजार ९५१ रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या प्रकरणातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात वाढत्या मालमत्ता गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने गस्त व गुप्त माहिती संकलन सुरू ठेवले होते.
दरम्यान, ४ मार्च २०२६ रोजी रेणापूर नाका येथील नवीन बसस्थानक परिसरात दोन संशयित महिला प्रवाशांच्या गर्दीत संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने आपले नाव पुनम जितू कांबळे (वय ३४, रा. गांधीनगर, उदगीर) असे सांगितले.
महिला पोलिसांकडून अंगझडती घेतली असता तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा सुमारे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा व ७८,९५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील चौकशीत आरोपीने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह गेल्या चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद आणि अहमदपूर बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. या तपासात औसा व अहमदपूर पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित बाबी उघडकीस आल्या आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून तिची साथीदार अनिता कांबळे ही फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख तसेच पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने व अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.
लातूर पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले असून बसस्थानक परिसरात प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे सांगितले आहे.
