Maharashtra today news,,,
BhiwandiCrime News“वंशाचा दिवा हवाच! मुली जन्माला आल्याने महिलेला अमानुष छळ”‘वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा’ ही मानसिकता आजही काही कुटुंबांमध्ये कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याच विकृत विचारसरणीमुळे भिवंडीतून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तिसरी मुलगी झाल्याच्या कारणावरून ३५ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या तिन्ही अल्पवयीन मुलींसह घराबाहेर हाकलून देण्यात आले आहे.
भिवंडीतील भादवड परिसरात राहणाऱ्या पीडितेचा विवाह २० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रकाश कांबळे याच्याशी झाला होता. विवाहानंतर तिला तीन मुली झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून वारंवार ‘मुलगा हवा’ म्हणून मानसिक दबाव टाकला जात होता.
पीडितेच्या तक्रारीनुसार, “आम्हाला मुलगा हवा आहे, त्यामुळे तू प्रकाशला त्याच्या प्रेयसीसोबत दुसरे लग्न करण्याची परवानगी दे,” असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. याच कारणावरून तिला शिवीगाळ, मारहाण तसेच सातत्याने शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागला.
१२ जानेवारी रोजी हा छळ टोकाला गेला. त्या दिवशी पीडितेला तिच्या तिन्ही अल्पवयीन मुलींसह घरातून हाकलून देण्यात आले. घराबाहेर काढल्यानंतर कोणताही आधार नसल्याने पीडितेला मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
अखेर सासरच्या जाचाला कंटाळून पीडितेने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात पती प्रकाश कांबळे, सासू विजयमाला कांबळे, नणंद कल्पना वाघमारे तसेच प्रकाश याची प्रेयसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांतीनगर पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे समाजात अजूनही मुलगा–मुलगी भेदभावाचे कटू वास्तव समोर आले असून या प्रकारावर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
