Politics / Social Issues गिरीश महाजनांच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; वन विभागाच्या माधवी जाधव यांचा निषेध
Politics / Social Issues गिरीश महाजनांच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; वन विभागाच्या माधवी जाधव यांचा निषेध
नाशिक | प्रतिनिधी
भारताच्या संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या देशात प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी त्यांचे नाव न घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असा आरोप आंबेडकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. नाशिक येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या अधिकृत कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
नाशिक येथे पार पडलेल्या शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रदीर्घ भाषण केले. स्वातंत्र्य, लोकशाही आणि विकासावर भाष्य करताना भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एकदाही न घेता भाषण संपवण्यात आले, ही बाब कार्यक्रमस्थळी उपस्थित अनेकांच्या लक्षात आली.
यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी उभे राहून या प्रकाराचा निषेध नोंदवला. “प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा दिवस आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न होणे हा केवळ विसर नसून थेट संविधानाचा अवमान आहे,” असे स्पष्ट शब्दांत माधवी जाधव यांनी सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिक, कर्मचारी वर्ग तसेच सामाजिक संघटनांमध्ये यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आंबेडकरी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत “बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही” अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून, सोशल मीडियावरही या प्रकरणावर तीव्र चर्चा सुरू आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी संविधान आणि त्याच्या शिल्पकारांचा सन्मान व्हायलाच हवा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या प्रकरणावर पालकमंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
